डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर यांनी लिहिलेल्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ या लेखमालेचा पाचवा भाग...........
शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर, सामर्थ्यशाली व तितक्याच प्रतिष्ठित तोडीस तोड घराण्यांची सोयरीक होती. शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण घटना होती. लखुजी जाधवराव व मालोजीराजे भोसले हे तितकेच तोलामोलाचे सरदार होते. म्हणूनच त्यांच्यात नातेसंबंध घडून यावेत असा विचार झाला व त्याप्रमाणे तो अमलातही आला. लखुजीराजे जाधवराव व मालोजीराजे भोसले एकत्रच पराक्रम गाजवत होते. तेव्हा दोघांनी आपल्या इच्छेनुसार विवाह निश्चित केला. जाधवराव-भोसले ही घराणी पूर्वीपासूनच नातेसंबंधांनी जोडलेली होती. या संबंधांना परत उजाळा देण्याचाही प्रयत्न या लग्नामुळे झाला.
मालोजीराजे भोसले यांची इच्छा होती, की शहाजीराजांचे लग्न सिंदखेडकर लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाऊ यांच्याशी व्हावा. लखुजीराजे ही निजामशाहीतील फार मोठी असामी होती. परंतु या सर्वांहूनही मोलाचा ठेवा म्हणजे त्यांची लेक जिजाऊ. जाधवरावांच्या अंगणात चमकणाऱ्या एका चाणाक्ष चतुर चांदणीवर मालोजीराजे भोसले यांचे लक्ष खिळले होते. हीच आपली सून व्हावी अशी त्यांची खूप इच्छा होती.
जाधवरावांची ही लेक होतीच तशी देखणी व बहुगुणी, जशी सोन्याच्या समईतील लवलवती सोनेरी ज्योतच. चपळ, नाजूक, सुंदर, हुशार, प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दीपकळी. हसऱ्या शहाजीराजांच्या शेजारी जिजाऊ शोभाव्यात कशा? अभिमन्यूशेजारी उत्तरा जशी. खरोखरच जिजाऊसारखे कन्यारत्न श्रीने पैदा केले होते!
आपले भाऊ मालोजीराजे भोसले यांच्या इच्छेनुसार विठुजीराजे भोसले यांनी लखुजीराजे जाधवरावांशी विवाहाची बोलणी केली. सनईची लकेर उठली. लखुजीराजे जाधवराव तर हरखूनच गेले. शहाजीराजांसारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून लाभतोय, हे पाहून ते आनंदले. लगीनघाई सुरू झाली. कामधामांची गर्दी उडाली. शुभमुहूर्त पाहिला गेला. कुंकवाचे टिळे लावले. तांबडे तुषार उडाले. दरवाज्यावर गणरायांनी आसन मांडले. मांडव पडला. बोहले सजले.
ढोल-ताशे-चौघडे- शहाजणे-सनई आपापले सूर धरू लागले. अन् एक दिवस वऱ्हाडी मंडळी आलीच. जाधवरावांची परकरी जिजा आता लगीनसाज सजली. हळद लागली. नितळ गोऱ्यापान पायांवर हळदी-कुंकवाची स्वस्तिके रेखली गेली. दो हाती हिरवा चुडा किणकिणू लागला. अंगावर मोराची हिरवीकंच पैठणी आली. भाळी मळवट भरला. त्यावर अक्षता चिकटल्या. मुंडावळ्या आणि बाशिंग भाळावर विराजले. अंगावरचे मौल्यवान सोन्या-हिऱ्या-मोत्यांचे दागिने, शेला अन् पदर सांभाळता सांभाळता लहानग्या जिजाऊ पार दमून गेल्या.
लगीनसाज ल्यालेल्या जिजा राणीच्या भांगात रत्नजडित बिंदी चमकत होती. सरळ नासिकेतील नथ चांदण्या फेकीत होती. कानात मोत्याचे झुबे डुलत होते. कमरेवर जडावाचा कमरपट्टा शोभत होता. दंडावरती सुबक घडीव वाक्या होत्या. पायात तोडे, साखळ्या, जोडवी, मासोळी, हातामध्ये लखलखत्या हिऱ्याच्या बांगड्या चमकत होत्या. वेणीवर फुलांची जाळी असून, त्यात रत्नांचे रेखीव अलंकार घातले होते. टपोऱ्या भावभऱ्या नेत्रांत काजळ दाटून आले होते. नखशिखांत सोन्यामोत्याने मढलेली सहीसही लक्ष्मीच जणू!
शहाजीराजेही लगीन साज सजले होते. त्यांनाही हळद लागली. कपाळावरील शिवगंध अधिकच हसरं झालं होतं. ओठांवरील मिसरूड आणखीनच काळवंडलं. मस्तकावरील मुक्त केशसंभार टोपाखाली अलगद बसला होता. गळ्यात पाणीदार मोत्यांचा कंठा रुळू लागला होता. नवरदेवाचे तेज नेत्रांत तळपू लागले होते.
मुहूर्ताची घटका बुडाली. तोफा बंदुकांचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अंतरपाट दूर झाला. शहाजीराजांनी आपल्या हातातील पुष्पमाला जिजाऊंच्या गळ्यात घातली. शहाजीराजांच्या शेल्याची जन्मगाठ बांधून घेऊन जाधवांच्या राजकन्या जिजामाता भोसल्यांच्या राजलक्ष्मी झाल्या. शहाजीराजे आणि जिजाईचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा सुंदर दिसत होता. अहो, अभिमन्यूला उत्तरा, शंकराला पार्वती शोभावी त्याप्रमाणे शहाजीराजांना जिजाऊ खुलून दिसत होत्या. हसऱ्या शहाजीराजांच्या शेजारी तितक्याच हसऱ्या, लाजऱ्या जिजाऊ खरोखरच दृष्ट लागाव्या अशाच दिसत होत्या.
कोणतीही मुलगी लग्नात सुंदर दिसतेच. ते लगीनतेज असते ना! पण जिजाऊ मूळच्याच रूपाने सुंदर होत्या. त्यातून लग्नाचा साज सजलेली सहीसही लक्ष्मीच. दुसरी उपमाच नाही. गोड शब्द स्वर, प्रेमळ बोलणे, विनयी वागणे आणि प्रसन्न हसणे. अशी जिजाऊंची मूर्ती होती.
रुंद छातीचे, पुष्ट खांद्यांचे, चमकदार डोळ्यांचे, बळकट दंडाचे व बाकदार नाकाचे, शौर्याने पृथापुत्र अर्जुनासारखे, दातृत्वाने विक्रमादित्यासारखे, शस्त्रास्त्र चालविण्यात पटाईत असणारे जावई लखुजीराजांना न आवडतील तरच नवल.
मालोजीराजांनी हा विवाह शहाजीराजे लहान असतानाच पक्का केला होता. लखुजीराजांनी योग्य, देखणा व कर्तृत्ववान मुलगा पाहूनच सर्वसंमतीने आपली एकुलती एक कन्या देण्याचा निर्णय घेतला होता. एकूणच लग्नसोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. विवाहाला एकच दु:खाची किनार म्हणजे सोहळा पाहायला मालोजीराजे नव्हते. इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे धारातीर्थी पडले होते. साऱ्यांना खंत तेवढीच होती. मालोजीराजे स्वर्गाच्या गवाक्षातून अश्रूंच्या अक्षता टाकीत म्हणाले असतील, की बाळांनो माझा आशीर्वाद आहे. उदंड आयुष्य लाभो. संसारी सुखाचे रामराज्य करा.
शहाजीराजे व जिजाऊसाहेब यांचा विवाह म्हणजे दोन शूर, सामर्थ्यशाली व प्रतिष्ठित घराण्यांची सोयरीक होती. सारे विवाहविधी यथासांग पार पडताच शहाजी राजे आणि जिजाऊ जोडीने मातोश्री उमाबाईसाहेबांपुढे आशीर्वादासाठी वाकले. आपल्या सुनेचे देखणे रूप आणि शालीनता, वागणे पाहून उमाबाईसाहेबही आपले दुःख विसरल्या. त्यांनी मोठ्या मनाने आणि भरल्या नेत्रांनी आशीर्वाद दिला. उमाबाईसाहेबांना लेक नव्हती. त्यामुळे जिजाऊंना पाहून उमाबाईसाहेबांना अगदी धन्य धन्य वाटत होते. काका विठोजीराजांनाही धन्यता वाटली. खरोखरच भोसल्यांची भाग्यभवानी उदयाला आली होती. भोसल्यांच्या कुळात सौभाग्य आले. नवा आनंद आला. वऱ्हाडची रुक्मिणी सोन्याच्या पावलांनी पुणे प्रांती आली. जिजाऊंनी सासरी येऊन आपल्या सासूचे दुःख हलके केले. सुनेच्या सहवासात उमाबाई पतिनिधनाचे दुःख विसरल्या.
हा विवाह म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणावी लागेल. कारण पुढे शहाजीराजे व जिजाऊसाहेब या दोघांच्या पोटी हिंदवी स्वराज्यसम्राट छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जन्म झाला.
जय जिजाऊ! जय शिवराय!
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर